जळगाव (दिव्य जळगाव) – शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या महामार्गावरील अतिक्रमणांवर आता महापालिका व पोलीस प्रशासनातर्फे संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सोमवारी दुपारी जळगाव महानगरपालिकेत महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीस स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, उपायुक्त पंकज गोसावी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक पवन देसले, नगरसेवक अरविंद देशमुख, नगरसेविका ॲड. शुचिता हाडा, National Highways Authority of India (NHAI) चे राहुल पाटील आणि अतिक्रमण विभाग प्रमुख संजय ठाकूर उपस्थित होते.
अजिंठा चौकातील भंगार बाजारावर कारवाई
शहरातील नेरी नाका ते अजिंठा चौक, अजिंठा चौक ते खेडी, अजिंठा चौक ते कुसुंबा आणि खेडी ते खोटे नगर या महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याबाबत ठोस नियोजन करण्यात आले. विशेषतः अजिंठा चौकातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला भंगार बाजार नागरिकांसाठी मोठी समस्या ठरत असून, पुढील तीन दिवसांत या भागातील अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडीवरही उपाययोजना
शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून कठोर पावले उचलली जाणार आहेत. शहरात ९५ रिक्षा स्टॉप असतानाही अनेक चालक रस्त्यावर कुठेही वाहन उभे करत असल्याने पुढील ८ दिवसांत अशा बेशिस्त चालकांवर कारवाई केली जाणार आहे. त्याआधी रिक्षा चालकांची बैठक घेण्यात येणार आहे.
मार्केट परिसरातील अस्ताव्यस्त पार्किंग रोखण्यासाठी वाहन टोईंग कारवाईही राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी लवकरच पुन्हा बैठक आयोजित केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

