जळगाव – एमआयडीसी परिसरातील आर.सी. फूड कंपनीत काम करत असताना मशिनमध्ये स्कार्फ अडकून मृत्यू झालेल्या महिला कामगाराच्या कुटुंबाला २० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी दुपारी जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी कि दि. १७ मार्च रोजी एमआयडीसीतील डी-६ सेक्टरमध्ये असलेल्या आर.सी. फूड कंपनीत काम करत असलेल्या जमुना रामकीरण पाटील या महिला कामगारांच्या गळ्यातील स्कार्फ मशिनमध्ये अडकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून कुटुंबातील कर्त्या महिलेचा आधार गेल्याने कुटुंब उध्वस्त झाला असून त्यांच्या मुलांवरही यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर सदर कंपनीकडून मृत महिला कामगाराच्या कुटुंबाला २० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी कंपनीने कामगारांसाठी विमा योजना केली आहे का व सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
हे निवेदन महिला महानगर अध्यक्षा मनीषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले असून यावेळी मोना माटील, विमल पाडूरंग, विजयाताई, स्वरणाताई, शोभाबाई, सुरेखाताई, संगितार्ता पाटील, सुशिला मूळे, पुष्पा चव्हाण यांसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

