जळगाव – लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर -४ प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी जळगावकरांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवत सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविले. यानिमित्ताने सेवा आणि सदाचाराने भरलेला एक असाही रविवार जळगावकरांनी अनुभवला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषद आमदार चंदूभाई पटेल, माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी विधान परिषद आमदार गुरुमुख जगवाणी, माजी महापौर विष्णू भंगाळे, ज्येष्ठ कार्यकर्त्या विजया मलारा, मिस मल्टीनॅशनल तन्वी मल्हारा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून आय.आर.एस. अधिकारी डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
यावर्षी हेल्प फेअर मध्ये एकूण ६० समाजसेवी संस्था व २६ सेवामहर्षी सहभागी झाले आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच यावर्षी शासकीय योजनांची, रोजगार मेळावा, खान्देशी खाद्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि हॉबी डूबी डू हा विभाग तसेच विविध क्षेत्रातील सेवादूतांचा सत्कारही या सोहळ्यात सामाविष्ट करण्यात आले आहे. सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांना मदतीचा हात देणे यासोबतच समाजाला समाजऋण फेडण्याचे नवनवे मार्ग दाखविणे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, दातृत्व जगविणे, तरुण पिढीला सेवाकार्यात करियरच्या नवीन वाटा दाखविणे हि या आयोजनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रामुख्याने याच हेतूने या सोहळ्याची मांडणी करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरवातीला सर्व मान्यवरांनी सेवाभावी संस्थांच्या स्टॉल्सला भेट दिली व त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. यानंतर त्यांचे स्वागत देखील एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. एखाद्या मंदिरात प्रवेश करावा यारीतीने घंटानाद करून त्यांना मंचावर बोलवण्यात आले, त्याचवेळी एलईडी स्क्रीनवर ज्येष्ठ सेवामूर्तींना देवाच्या स्वरूपात दाखवून एक अनोखा संदेश यावेळी देण्यात आला. यानंतर मंचावर स्थानबद्ध झाल्यावर सर्वांना हेल्प-फेअरचा परिचय देणारी फिल्म दाखवण्यात आली. मल्हार कम्युनिकेशन्सचे आनंद मल्हारा यांनी प्रस्तावना केली तर हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर सेवामहर्षी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ज्यात काल एकूण ९ सेवाव्रतींना सन्मानित करण्यात आले. एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होते तर दुसरीकडे खाद्यजत्रेचा आनंद जळगावकर लुटत होते. आलेल्या पाहुण्यांचा उत्साह पाहता हेल्प-फेअरला खरोखरच एका जत्रेचे स्वरूप मिळाले होते. मानवतेच्या या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी जास्तीतजास्त नागरिकांनी हजेरी लावून एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यावी, असे हेल्प फेअर टीम तर्फे आवाहन करण्यात आले आहे.