श्रीरामाला न मानणारे वा ‘श्रीराम हा देव नाही’, असे म्हणणारे कम्युनिस्ट वा डाव्या विचारांचे लोक हे आताच्या काळात आहेत असे नाही, तर सत्ययुगातही होते. हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला ‘देव कुठे आहे ?’, असे विचारले होते. ‘हिरण्यकश्यपू’ हा सत्ययुगातील कम्युनिस्टच होता. सत्ययुगात भगवंत खांबातून प्रकट झाला. तसे आताच्या कलीयुगामध्ये ‘राम नाही’ म्हणणार्यांसाठी भगवान श्रीराम भूमीतून (उत्खनातून) प्रकट झाले. कम्युनिस्ट रामाला मानत नसतील, तर ‘सीताराम येचुरी’सारखे कम्युनिस्ट स्वत:चे नाव ‘सीताराम’ का ठेवतात ? ते स्वत:चे नाव का पालटत नाहीत ? अनेक कम्युनिस्ट स्वत:च्या घरामध्ये देवीदेवतांच्या मूर्ती आणि चित्रे ठेवतात अन् बाहेर देवतांना विरोध करतात, हे वास्तव आहे. द्वेषाने का होईना, रावणाने श्रीरामाचे नाव घेतल्याने त्याचा उद्धार झाला; मात्र स्वत:च्या मुक्तीसाठी धडपडणार्या कम्युनिस्टांनाचाही भगवान श्रीराम उद्धार करतील, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशातील ‘अयोध्या संत समिती’चे महामंत्री महंत पवनकुमारदास शास्त्रीजी महाराज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘प्रभु श्रीराम आणि रामराज्य आदर्श का ?’ या ‘ऑनलाईन विशेष परिसंवादा’त ते बोलत होते. हा कार्यक्रम ‘फेसबूक’ आणि ‘यू-ट्यूब’ यांच्या माध्यमातून 8200 लोकांनी पाहिला.
श्रीरामाच्या अस्तित्वाविषयी प्रश्न उपस्थित करणार्यांना उत्तर देतांना इतिहास अभ्यासक श्रीमती मिनाक्षी शरण म्हणाल्या की, रामायणाच्या 300 हून अधिक आवृत्त्या विविध भाषांमध्ये निघाल्या आहेत. आशिया, युरोपसह अनेक खंडांमध्ये श्रीरामांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. मलेशियासारख्या इस्लामी देशामध्ये तेथील मंत्री मंत्रिपदाची शपथ ही श्रीरामाची चरणधूळ आणि पादुका यांचा उल्लेख करून घेतात. इंडोनेशियातील भिंतींवर रामायण कोरलेले आहे. बालीमध्ये तर रस्त्यावर, गल्लोगल्ली श्रीरामाविषयी लिहिलेले आढळते. थायलंडमध्ये तेथील राजे स्वतःच्या नावाच्या आधी ‘राम’ असे नाव लावत होते. तेथील शाळा-महाविद्यालयात रामायण शिकवले जाते आणि हिंदुस्थानात मात्र रामाच्या अस्तित्वाविषयी पुरावे मागितले जातात. हे अन्य पंथीय आणि कम्युनिस्ट यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी रचलेले षड्यंत्र आहे. हे समजून घेण्यासाठी हिंदूंनी आपल्या धर्माचा अभ्यास केला पाहिजे.
या वेळी बोलतांना नवी दिल्ली येथील हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, आज आपल्या निधर्मी देशात श्रीरामाचे मंदिर जरी उभारले जात असले, तरी देशात मंदिरातील मूर्तींची तोडफोड, हिंदू युवतींची गोळ्या घालून हत्या, लव्ह जिहाद, आतंकवाद, युवकांची व्यसनाधिनता, गोहत्या, कोरोना महामारीत रुग्णांची लुटमार चालूच आहे. गेल्या 70 वर्षांत जनतेला धर्माचरण न शिकवल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याउलट रामराज्यात कोणीही व्यक्ती दु:खी, पीडीत नव्हता. सर्वजण सुखी होते; कारण सर्वजण धर्माचरणी, परोपकारी आणि मर्यादांचे पालन करणारे होते. त्यामुळे त्यांना भगवान श्रीरामासारखा आदर्श राजा मिळाला. आपल्यालाही श्रीरामासारखा आदर्श राजा हवा असेल, तर आपल्यालाही धर्माचरण आणि साधना करायला हवी. तसे झाले तर केवळ श्रीराम मंदिराचे निर्माणच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवर ‘रामराज्य’ आल्याशिवाय राहणार नाही.