जळगाव – मूळजी जेठा महाविद्यालयात आज संविधान दिनानिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि भाषा व सामाजिक शास्त्रे प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादन व विशेष व्याख्यानाचे’ सकाळी ११.०० वाजता आयोजन करण्यात आले.
प्रारंभी महाविद्यालयाच्या ह्युमिनिटी बिल्डींग समोर भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन केले गेले. यावेळी भाषा प्रशाळेचे संचालक डॉ.भूपेंद्र केसुर आणि सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.देवेंद्र इंगळे यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान प्रत यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले. तसेच उपस्थित सर्व प्राध्यापकांनी उद्देश पत्रिकेचे सामुहिक वाचन केले. यानंतर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्याला वक्ते म्हणून राज्यशास्त्र विभागाचे डॉ. जयेश पाडवी उपस्थित होते.
उपस्थित श्रोत्यांना संबोधित करतांना ते म्हणाले, “ भिन्न धर्म, भिन्न प्रांत, भिन्न भाषा, भिन्न आचार-विचार व भिन्न वेश अशा अनेक दृष्टीने भिन्न असलेल्या देशातील जनतेला एकसंध राखण्यात आपल्या देशाच्या संविधानाची फार मोठी भूमिका आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना देखील व्यापक लोकधर्मी स्वरूप देण्यात आपले संविधान यशस्वी झाले आहे. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर देशासमोर अनेक आव्हाने आणि अडचणी होत्या. त्याच्या निराकारनाचे उपाय आपल्या संविधान निर्मिकांनी संविधानाद्वारे भारतीय जनतेला सांगितलेले आहेत. राजकारण, समाजकारण, शैक्षणिक पुनर्रचना, पारस्पारिक सहजीवन, आंतरराष्ट्रीय सांमजस्यपूर्ण नवरचना अशा कितीतरी गोष्टींचे गमक भारतीय संविधानात आहे. खऱ्या अर्थाने हे संविधान भारत आणि लोकशाही याचा आत्मा आहे.’’
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मूजेच्या सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.देवेंद्र इंगळे यांनी भूषवले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, ‘ नागरिकांनी संविधानात दिलेल्या तत्वांचे तंतोतंत अनुपालन केल्यास समाज आणि राष्ट्र अजून सशक्त बनू शकेल. प्रत्येक स्तरावरील विषमता हे लोकशाहीला लागलेले कलंक आहे. ते धुण्यासाठी आपल्या प्रत्येकाला संविधानिक मूल्यांची जपवणूक करावी लागेल.’’
सूत्रसंचालन डॉ.योगेश महाले यांनी केले तर प्रास्ताविक रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी प्रा.दिलवरसिंग वसावे यांनी केले. डॉ.चंद्रमणी लभाणे, प्रा.के.के.वळवी, डॉ.उज्वला नेहेते, डॉ.भाग्यश्री भलवतकर, डॉ.जुगलकिशोर दुबे, प्रा.विजय लोहार, डॉ. सागर बडगे, प्रा.राजीव पवार, डॉ.लक्ष्मण वाघ, डॉ. अखिलेश शर्मा, प्रा.अनिल क्षीरसागर, डॉ.नशिकेत सूर्यवंशी, डॉ.जयश्री निकम, डॉ.देवानंद सोनार, डॉ.विशाल देशमुख, डॉ.योगेश महाले इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते.