कवठळ (ता. धरणगाव) – धरणगाव तालुक्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कवठळ गावातील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे. गावातील हनुमान मंदिर ते दूध डेअरीपर्यंतच्या गटाराची अवस्था अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती.
या समस्येची दखल घेत गावातील युवा कार्यकर्ते विशाल पाटील, ज्ञानेश्वर पाटील आणि बबलू पवार यांच्या नेतृत्वाखाली “एक दिवस स्वच्छतेचा दिवस” हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये तरुणांनी एकत्र येऊन गटारातील घाण, प्लास्टिक कचरा व साचलेला गाळ काढून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली.
या उपक्रमात तुषार, यश, वैभव, सचिन सूर्यवंशी, विलास सोनवणे यांच्यासह अनेक तरुणांनी सहभाग घेतला. गावातील तरुणांच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत असून, आजूबाजूच्या गावांतील युवकांनीही स्वच्छतेबाबत जनजागृती करून वर्षातून किमान एक दिवस गाव स्वच्छतेसाठी समर्पित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

