जळगाव – राज्यातील महिला सुरक्षा आणि कल्याणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला व बालविकास विभागातूनच एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलं आहे. विभागातील महिला अधिकारीच सुरक्षित नसल्याचे गंभीर आरोप आता उघडपणे करण्यात येत आहेत.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi tatkare) खाजगी सचिव राजेश गायकवाड (Rajesh Gaikwad) यांच्यावर विभागातील महिला अधिकारी आणि राजपत्रित अधिकारी संघटनेकडून गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकारी महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील आणि अपमानास्पद वर्तन करतात, मानसिक त्रास देतात, तसेच बदलीच्या नावाखाली आर्थिक आणि मानसिक शोषण केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी आर. आर. तडवी यांनीही गंभीर आरोप करत आपली व्यथा मांडली आहे. त्यांनी केलेल्या आरोपांमुळे विभागात मोठी खळबळ उडाली असून महिला अधिकाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, ज्या विभागावर महिलांच्या सन्मान आणि सुरक्षेची जबाबदारी आहे, त्याच विभागात महिला अधिकारी असुरक्षित असल्याचा आरोप होत असल्याने प्रशासन आणि सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
आता या प्रकरणात शासन आणि महिला व बालविकास विभाग काय भूमिका घेणार? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

