जळगाव – महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या लेखणीने गंधित झालेल्या जळगाव शहरात शनिवार, दि.८ फेब्रुवारी रोजी साईलिला सभागृह, शिरसोली रोड येथे होत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या एकदिवसीय साहित्य संमेलनात सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विषयावर विचारमंथन होणार असून २ परिसंवाद, १ कवी संमेलन आणि लोककलावंतांच्या कलाविष्काराचा यात समावेश आहे, अशी माहिती आयोजकांनी बुधवारी दिनांक ५ फेब्रुवारी रोजी दिली.
पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे उपाध्यक्ष मुकुंद धजेकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नेरपगारे, राजकुमार गवळी उपस्थित होते.नाभिक समाजात अनेक प्रतिभावंत साहित्यिक आणि कलावंत आहेत. परंतु त्यांना हक्काचे स्थान मिळत नसल्याने ते प्रकाशात येत नाहीत. परिणामतः त्यांची प्रतिभा दडून राहते. समाजातील अशा या सर्व प्रथितयश आणि नवोदित साहित्य, कलाप्रेमी आणि लोककलावंतांना हक्काचे स्थान मिळावे या सार्थ हेतूने महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाची स्थापना २०१९ मध्ये करण्यात आली. संघातर्फे प्रथम साहित्य संमेलन अमरावती येथे ९ नोव्हेंबर २०१९ ला तर द्वितीय साहित्य संमेलन शेगाव येथे ८ मार्च २०२२ रोजी यशस्वीरित्या संपन्न झाले. आता हे तिसरे साहित्य संमेलन जळगाव येथे होऊ घातले आहे.
शनिवारी आयोजित तृतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक तथा नाभिक मंच संपादक, धुळे येथील भगवान चित्ते यांची तर, उद्घाटक म्हणून बंगळूरू येथील प्रा. डॉ. विष्णुकांत चटपल्ली (माजी उपकुलगुरू, कर्नाटक राज्य ग्रामीण विकास व पंचायत राज युनिव्हर्सिटी, गदग, कर्नाटक) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष रविंद्र (बंटी) नेरपगारे (जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, जळगाव) हे असून प्रमुख अतिथी म्हणून सयाजी झुंजार (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ), रितेश सेन (आमदार, वैशाली नगर, छत्तीसगड), मनोज महाले (उपसचिव, उपमुख्यमंत्री कार्यालय, मुंबई) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सत्रादरम्यान साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाईल. तसेच अनेक साहित्यिकांच्या काव्यसंग्रहाचे आणि साहित्यकृतीचे प्रकाशान मंचावरून केले जाणार आहे.


