जळगाव – सुमारे चार हजार वर्षापूर्वी भारतात सिंधु नदीच्या खोऱ्यात प्रगत नागरी व कृषी संस्कृती बहरली होती. मोहंजोदडो व हडप्पा येथे उत्खननात सापडलेली पक्क्या विटांची घरे, रूंद रस्ते, भव्य स्नानगृहे, आकर्षक शिल्पे, धान्याची कोठारे याची साक्ष आजही देतात. या प्रदेशात न्यायी व पराक्रमी असुर वंशीय राजांचे राज्य होते. येथे महान तत्वदर्शी व जैन मताचा प्रवर्तक असुरसम्राट विरोचन याचा पुत्र बळीराजा राज्य करित होता. त्याच्या राज्यात कृषी संस्कृती बहरली होती, व्यापार फुलला होता.
बळीराजाचा पुत्र बाणासुराने शेतकरी व कष्टकऱ्यांचे सैन्य जमवून वामनावर हल्ला चढवून वामनाचा पराभव केला, त्याला ठार केले, लुटलेले धनद्रव्य परत मिळविले आणि समस्त जनतेमध्ये वाटुन टाकले. बाणासुराचे विजयी सैन्य बळीच्या राज्यामध्ये येताच घरोघरी स्त्रियांनी त्यांना आनंदाने ओवाळले आणि प्रार्थना केली. “इडा पिडा टळो ! बळीचे राज्य येवो !!” हाच दिवस म्हणजे ‘बलिप्रतिपदा’ अर्थात बळीराजा गौरव दिवस. म्हणून आजही पत्नी आजच्या दिवशी पतीला ओवाळतांना प्रार्थना करते “इडा पिडा टळो ! बळीचे राज्य येवो !!”
गौरवशाली इतिहास समजुन घेवून आपल्या पराक्रमी पूर्वज चक्रवर्ती सम्राट बळीराजाचे स्मरण करून “बळीराजा गौरव दिन” साजरा करणेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, आमदार राजुमामा भोळे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, महापौर जयश्रीताई महाजन, उद्योगपती डी. डी. बच्छाव, श्रीराम पाटील तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, मराठा प्रीमियर लीग व बुलंद छावा या संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे उपस्थितीत बळीराजा चे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना रंगकर्मी शंभू पाटील यांनी केली.