मुक्ताईनगर – मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील नवीन -जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी सौ रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून सुरु असलेली जन संवाद यात्रा ही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना केवळ मतदारांशी संवाद साधून वैयक्तिक समस्यासह गावोगावच्या अडिअडचणी जाणून घेण्याच्या उद्देशाने सुरु असलेली ही संवाद यात्रा राज्यासाठी मॉडेल ठरू शकते, रोहिणी ताईंच्या मनातही विकासाची तळमळ असल्याचे यावरून दिसून येते. रोहिणी ताईंनी उचललेले हे पाऊल निश्चितपणे दिशादायी असून अभिनंदनीय आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेली चूक पुन्हा करू नका,आता यापुढे रोहिणीताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहा “असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांनी संवाद यात्रेदरम्यान उपस्थिताना केले. याप्रसंगी नाथाभाऊ जरी राज्याचे आमदार असले तरी त्यांच्या आमदार निधीवर आपला मतदार संघ सर्वात जास्त हक्कदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याकडून चूक झाली, तेव्हा झालेली चूक आता सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भरवशावर विजयी झालेला आमदार जो पवार साहेबांना झाला नाही, जो शिवसेनेला झाला नाही तो जनसामान्यांना काय होणार?असा प्रश्न करत यापुढे भक्कमपणे रोहिणीताईंच्या पाठीशी उभे राहायचे आहे, आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करीत अजित पवार साहेब,सुप्रिया ताईं, जयंत पाटील साहेबांचे हात मजबूत करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
गेले तिस वर्ष विकासाचे राजकारण केले -एकनाथराव खडसे
यावेळी बोलतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, गेले तिस वर्ष आपण या मतदारसंघाचे नेतृत्व केले. या तिस वर्षात सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तिस वर्षात विकासाचे राजकारण केले. बोदवड तालुक्याची निर्मिती केली. त्यामुळे तालुक्यात सर्व प्रशासकीय कार्यालये आली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणली. बोदवड तालुक्यातील सर्व गावे डांबरी रस्त्यांनी जोडले. बोदवड उपसा सिंचन योजनेची मुहूर्तमेढ रोवली ती पूर्णत्वास नेण्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. माजी जलसंपदा मंत्री यांनी या योजनेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला असून त्यातून योजनेचे उर्वरित काम सुरू होईल
आपण तिस वर्ष सतत विकासाचे राजकारण केले. आताचे आमदार हे मंजूर विकास कामांवर स्टे आणणारे आमदार आहेत. शरद पवार साहेबांनी आपल्याला आमदार केले आता आपल्या सर्वांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याची जबाबदारी असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी करण्याचे त्यांनी आवाहन केले.