जळगाव – केळी पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे कायम ठेवावेत, म्हणून राज्य सरकारने चार वेळा केंद्र सरकारकडे विनंती केली आहे. केंद्राने याकडे दुर्लक्ष केले. यात राज्य सरकारची चूक नाही.
केळी पीक विम्या प्रश्नी राज्य सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, असा आरोप भाजपाचे नेते करत आहेत. मात्र, ही वस्तुस्थिती नसुन भाजपाचे ‘लबाड लांडगे’ लोकांची दिशाभूल करत आहे, असा जोरदार हल्ला राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपावर चढवला.
केळी पीक विम्याच्या विषयावरून सध्या जळगावात भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्य सरकारने यावर्षी पीक विम्याचे निकष बदलले असून, ते शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत, असा आरोप करत भाजपाने येत्या 9 नोव्हेंबरला रास्तारोको आंदोलनाची हाक दिली आहे.
सोंगाड्या खासदारांनाही नाच्याप्रमाणे नाचवेल
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी केळी पीक विम्याच्या विषयावरून राज्य सरकारवर टीका केली. गुलाबराव पाटील यांना लक्ष करताना उन्मेष पाटील यांनी ‘शिंगाडा मोर्चा काढणारे आता सोंगाडे झाले आहेत’, अशा शब्दात टीका केली. त्यालाही गुलाबराव पाटील यांनी उत्तर देत जहरी टीका केली सोंगाड्या तमाशात नाचणाऱ्या नाच्यांना नाचवतो असे म्हणत उन्मेष पाटील यांना माहिती नाही. मी खेड्यातील सोंगाड्या आहे. सोंगाड्या हा तमाशात नाचणाऱ्या नाच्यांना नाचवत असतो. मी ठरवले तर या खासदार नाच्याला कधीही नाचवू शकतो, अशी टीका पाटील यांनी केली.
केंद्राने सहकार्याची भुमिका घेतली नाही
केळी पीक विम्याच्या बाबतीत राज्य सरकारने केंद्राकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र, केंद्राने सहकार्याची भूमिका घेतली नाही. असे असताना भाजपाचे लबाड लांडगे शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्यात धमक असेल तर, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारावेत. त्यांना केळी पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे ठेवायला सांगावे. केंद्राने केळी पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे ठेवले तर, जाहीर व्यासपीठावर भाजपाच्या नेत्यांचा सत्कार करेन, असे खुले आव्हानही गुलाबराव पाटील यांनी दिले.


