मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्र राज्य मंडळानं दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक देण्यात आलं आहे.
यंदाच्या वर्षी 12 वीची परीक्षा 23 एप्रिलपासून तर 21 मे रोजी 12 वीचा शेवटचा पेपर असेल. यासोबतच 10 वीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे. 10 वीच्या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि 12 वी च्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागू शकतो, असं सांगितलं जात आहे.
कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा उशीरा सुरू होणार आहेत. याशिवाय कोरोनाची लागण झालेल्या किंवा क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाने डोकं वर काढल्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोलाचा पेपर झाला नव्हता, अखेर राज्य सरकारने हा पेपर रद्द करत विद्यार्थ्यांना सरासरी मार्क देण्याची घोषणा केली होती.