आयपीएलच्या कारकिर्दीत पहिलं शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेलं १८० धावांचं आव्हान दिल्लीने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. अक्षर पटेलने रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर षटकार लगावत दिल्लीला सामन्यात विजय मिळवून दिला. शिखर धवनने या सामन्यात नाबाद १०१ धावांची खेळी केली.
१८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पृथ्वी शॉ दिपक चहरच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात माघारी परतला. यानंतर अजिंक्य रहाणेही झटपट माघारी परतल्यामुळे दिल्लीचा संघ अडचणीत सापडला. यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार श्रेयस अय्यर आणि शिखर धवनची चांगली जोडी जमली. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी करत दिल्लीच्या डावाला आकार दिला. दरम्यानच्या काळात शिखरने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. श्रेयस अय्यर एक बाजू लावून धरत असताना शिखरने शारजाच्या मैदानात काही सुरेख फटके खेळले.
नाणेफेक जिंकत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तुषार देशपांडेने पहिल्याच षटकात सॅम करनला माघारी धाडत चेन्नईला मोठा धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या शेन वॉटसन आणि सॅम करन या जोडीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी मैदानावर आपले पाय स्थिरावल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. डु-प्लेसिसने आक्रमक पवित्रा घेत चांगली फलंदाजी करत दिल्लीच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलं. अखेरीस नॉर्जने वॉटसनचा त्रिफळा उडवत दिल्लीला मोठं यश मिळवून दिलं. दरम्यानच्या काळात डु-प्लेसिसने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दिल्लीच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत डु-प्लेसिसने ४७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या.
यानंतर मैदानावर आलेल्या धोनी आणि रायुडू जोडीने फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्याचं आव्हान स्विकारलं. मात्र नॉर्जच्या गोलंदाजीवर पुढे येऊन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात धोनी स्वस्तात माघारी परतला. मात्र अंबाती रायुडूने रविंद्र जाडेजाच्या सोबतीने फटकेबाजी करुन चेन्नईला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. दिल्लीकडून नॉर्जने २ तर तुषार देशपांडे आणि कगिसो रबाडाने प्रत्येकी १-१ बळी घेतला.


