जळगाव (नाजनीन शेख) – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 22 जुलैपासून आक्रमक झाली होती. अनेक जिल्ह्यांत तत्काळ निषेध आंदोलने, माफीची मागणी आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आले. मात्र जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तब्बल 15 दिवस कोणतीही ठोस भूमिका दिसून आली नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वावर आता राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित होत आहेत.
गुरुवार, 6 ऑगस्ट रोजी काँग्रेस भवनाबाहेर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनात माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले. हर्षवर्धन सपकाळ यांनी 24 तासांत माफी मागावी, अशी मागणीही करण्यात आली.
मात्र आंदोलनापेक्षा त्याच्या विलंबाचीच अधिक चर्चा रंगली. राज्यभर हा मुद्दा गाजत असताना जळगाव जिल्हा संघटना इतके दिवस शांत का होती? जिल्हाध्यक्ष म्हणून संजय पवार यांनी तातडीने भूमिका का घेतली नाही? पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवण्यासाठी तब्बल 15 दिवस का लागले? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, आंदोलनासाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. काँग्रेसने हे केवळ शिष्टाचाराचे स्वागत असल्याचे स्पष्ट केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यावर नाराजी व्यक्त केली.
एकीकडे राज्यभर पक्ष आक्रमक भूमिका घेत असताना जळगाव जिल्हा नेतृत्व मात्र शांत राहिल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. हा संघटनात्मक ढिसाळपणा होता की जाणीवपूर्वक घेतलेला राजकीय निर्णय, याबाबत जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.

