जळगाव – बालकांनी आपल्या सुप्त इच्छा प्रकट करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे नाट्य होय. यातून त्यांनी धडे घेत आपले उद्दिष्ट्य प्राप्त केले पाहिजे. त्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देणे गरजेचे असल्याचा सूर माध्य. शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यातर्फे के.सी.ई.सोसायटीचे कान्ह ललित कला केंद्रातर्फे आयोजित 10 दिवसीय बालनाट्य अभिनय कार्यशाळच्या समारोपात निघाला.
10 दिवसीय बालनाट्य शिबिराचा समारोप मोठ्या थाटात कान्ह सभागृहात पार पडला. यात मोबाईलपासून दूर राहण्यासाठी अशा कलांचे प्रशिक्षण गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपली कला जोपासत अभ्यासात लक्ष देणेही गरजेचे असल्याचे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले. दरम्यान, प्रास्ताविकात डॉ. वैभव मावळे यांनी अभिनय कार्यशाळेत साधारणतः 60 विद्यार्थी असून यातील प्रत्येक विद्यार्थ्यात सुुुप्त गुण असून पालकांनी या गुणांना वाव देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
दि. 27 एप्रिल रोजी कान्ह ललित कला केंद्रातर्फे लहानग्यांसाठी बालनाट्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शैक्षणिक संचालिका मृणालिनी फडणवीस, सुनील वानखेडे, सांस्कृतिक संचालक शशिकांत वडोदकर, शालेय विभाग प्रमुख अशोक राणे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम हेमंत पाटील आणि डॉ. शमा सराफ आदी उपस्थित होते. यावेळी कान्ह ललित कला केंद्रातर्फे होणार्या उपक्रमांची माहिती देत लहान मुलांनी आपल्या भावविश्वाला गवसणी घालण्याचे हे उत्तम माध्यम असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना शशिकांत वडोदकर यांनी शुभेच्छा दिल्या. यशस्वितेसाठी दिनेश माळी, धनश्री शिंपी, कादंबरी चौधरी, कृतिका कोरे, हिमानी पाटील, अम्रिता बोहरा, गोपाल मोरे, रोनक तडवी, मयूर तायडे, पवन निकम, अभय साळुंखे, सिद्धी कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन अन् आभार कान्ह ललित कला केंद्राचे समन्वयक प्रसाद देसाई यांनी मानले.
बालकांच्या सादरीकरणाने पालकांना भुरळ
या 10 दिवसीय अभिनय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी 5 नाटके बसवून त्यांचे सादरीकरण पालक आणि मान्यवरांसमोर केले. यात 3 नाटिका आणि दोन मूकनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
शालेय विज्ञान नाट्य स्पर्धा कान्हत होणार
माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी आपल्या भाषणात दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी होणारी बालनाट्य विज्ञान नाट्य स्पर्धेचे आयोजन कान्ह ललित कला केंद्र करेल, असे आश्वासन दिले. यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. डिसेंबर महिन्यात होणारी ही स्पर्धा आता कान्ह ललित कला केंद्र यांच्या अखत्यारित होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


