जळगाव – ‘अर्हम विज्जा’चे प्रणेते, श्रमण संघीय उपाध्याय प्रवर, ओजस्वी वक्ता श्री प्रविणऋषीजी महाराज साहेब व मधुरगायक, सेवाभावी श्री तीर्थेशऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासा निमित्त गणपतीनगर स्थित स्वाध्याय भवन येथे मंगल प्रवेश झाला. जळगावकरांच्या प्रेमापोटी ‘वर्षी-तप’ सारखी कठीण तपश्चर्या सुरू असताना ७०० किलोमिटरची पदयात्रा विहार करीत श्री. प्रविणऋषीजी म.सा. जळगावात पोहचले. दोन्ही संतांच्या स्वागतासाठी निघालेल्या भव्य शोभायात्रेत कलशधारी कन्यांसह श्रावक-श्राविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
जैन हिल्स येथून आज सकाळी श्री प्रविणऋषीजी म. सा. व श्री. तीर्थेशऋषीजी म. सा. यांनी पायी विहारास सुरवात केली. यावेळी त्यांच्यासोबत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन होते. भाऊंचे उद्यान काव्यरत्नावली चौक येथून समाजबांधवांनी गुरूभगवंतांच्या स्वागतासाठी आकर्षक शोभायात्रेचे आयोजन केले होते.
याप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष कस्तुरचंद बाफना, संघहितैषी प्रदीप रायसोनी, मंत्री अनिल कोठारी, महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती-२०२५ चे अध्यक्ष राजकुमार सेठिया, मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष ललित लोडाया, दादावाडी विश्वस्त प्रदीप मुथा, जयमल संघाचे स्वरूप लुंकड, पारस राका, साधूमार्गी संघाचे मोतीलाल मुणोत, विनोद मल्हारा, रत्नसंघाचे सुनील बाफना व अमर जैन तसेच पदाधिकारी यांच्यासह जय आनंद ग्रुप, युवाचार्य ग्रुप, श्रमण महिला मंडळ, आदी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
‘अहिंसा परमो धर्म’चा दिला संदेश
भाऊंच्या उद्याना जवळील काव्यरत्नावली चौकातून उत्साहात निघालेली शोभायात्रा ही जैन धर्मनाथ मंदीर, अल्पबचत निवास मार्गे स्वाध्याय भवन येथे पोहचली. कलशधारी कन्या, अष्टमंगल, अर्हम विज्जा त्यात ‘आत्मा में परमात्मा की अनुभूती कराने की कला, श्रेष्ठत्व जीवन का निर्माण, मातृत्व एवं पितृत्व को दिव्य अनुभूती के साथ जीना’ असे सामाजिक संदेश दिले होते. आनंद ओवी, जैन ध्वजद्वारे ‘अहिंसा परमो धर्म’ हेच मनुष्य कल्याणाचे साधन असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश-घोषणा शोभायात्रेतून दिल्या गेल्या.


