धरणगाव – शहरात आधीच १० ते १२ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. त्यात नळांना येणारे पाणी खूपच गढूळ आणि दूषित स्वरूपाचे असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाईपलाईनच्या कामांमुळे वारंवार खोदकाम केल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. नागरिकांना पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे. पथदिवे बंद पडले असून, गटारी सुद्धा तुंबल्या आहेत. यासह अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज शुक्रवारी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
दरम्यान,धरणगाव नगर परिषदेच्या गलथान कारभारावर माजी मंत्री श्री.देवकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाला कडक शब्दात जाब देखील विचारला. नगर परिषदेचा कारभार वाऱ्यावर असल्याने शहरातील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. नागरिकांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविल्या जात नाहीत. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभे करू, असा इशारा देखील माजी मंत्री देवकर यांनी दिला. तसेच नगरपरिषद प्रशासनाला निवेदन सुद्धा देण्यात आले.
याप्रसंगी शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, जेष्ठ नेते मोहन पाटील, तालुका कार्याध्यक्ष अरविंद देवरे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष भूषण भागवत यांच्यासह अमोल हरपे, नारायण चौधरी, रमेश महाजन, अशोक जाधव, गोविंद पाटील, चेतन पाटील, सागर महाले, वैभव बोरसे, अतुल वाघ, निखिल पाटील, विनित पाटील, सागर चव्हाण, प्रफुल पवार, दिनेश भदाणे, रामकृष्ण मराठे, अशोक पाटील, दुर्गेश चौधरी, नितीन पाटील, गौरव पाटील, जयेश पाटील, चंपालाल भदाणे, रमजान शाह, सचिन पाटील, किशोर भदाणे, निखिल भदाणे, विनायक पाटील यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.