जळगाव – शहादा येथे १९ ते २३ एप्रिल या कालावधीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात सहभागी होणाऱ्या कलावंत विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होवू नये याची पूर्ण दक्षता घेवून महोत्सवाचे आयोजन केले जाणार असल्याचे आयोजन समितीच्या बैठकीत सांगण्यात आले.
कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आयोजन समितीची बैठक झाली या बैठकीत शहादा येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे औषध निर्माणशास्त्र तसेच कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे आयोजित युवारंग युवक महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. उन्हाची तिव्रता लक्षात घेवून कोणत्या प्रकारची खबरदारी घेतली जात आहे. याची माहिती आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर.एस. पाटील आणि डॉ. सुनील पवार यांनी दिली. आयोजन समितीच्या सदस्यांनी यावर सविस्तर चर्चाकरून सूचना केल्या. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्टेजवर कुलरची व्यवस्था, वैद्यकीय पथक, सुरक्षा, तसेच विद्यार्थ्यांसाठी ग्लुकोज (ओ.आर.एस.) व्यवस्था करण्यात येणार आहे. दि. १९ एप्रिल रोजी दुपारी काढण्यात येणारी शोभायात्रा उन्हाची तिव्रता लक्षात घेवून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दु. १२ ते ४ या वेळेस खुल्या रंगमंचावर स्पर्धा होणार नाहीत. वेळापत्रकात नव्याने बदल करून सकाळी लवकर स्पर्धा सुरू होतील. २० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता उद्घाटन करण्याचा निर्णयही याबैठकीत घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी हा महोत्सव घेतला जाणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जाईल असे यावेळी सांगण्यात आले. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी बैठकीत मार्गदर्शन करतांना सर्वांच्या सहकार्याने महोत्सव यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.