चाळीसगाव प्रतिनिधी – शहादा येथून औरंगाबाद खंडपीठात तारखेसाठी जात असलेल्या कुटुंंबाच्या कारला अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात शहादा येथील दोघेजण जागीच ठार झाले. तर कारमधील अन्य तिघे गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि.१४) पहाटे ६ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बायपास रस्त्यावरील पाटणादेवी चौफुलीजवळ हा अपघात झाला.
आबिद खान अहमद खान पठाण (वय ६२) व शेख शब्बीर शेख जलदीश (वय ६५) अशी मृतांची नावे आहेत. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जुल्फिकार खान अलमास खान पठाण (वय ४२) हे शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत कुटुंबासह राहतात. गॅरेजवर मॅकेनिकचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात. ते व त्यांचे सासरे आबिद खान अहमद खान पठाण, सासू रुखसाना आबिदखान पठाण (वय ५५), सासऱ्यांचा मानलेला मुलगा तहसीब रफिक शेख (वय २५) व मामसासरे शेख शब्बीर शेख जलदिश (रा.खेतिया) हे सर्वजण शहादा येथून सोमवारी पहाटे २ वाजता कारने (एम.पी.४६ सी.ओ.९०१) औरंगाबाद हायकोर्टात तारखेला जाण्यासाठी निघाले होते. कार शब्बीर जलदीश शेख हे चालवत होते.


