मुंबई – राजस्थान, दिल्ली तसेच पश्चिम बंगाल सरकारने त्यांच्या राज्यात दिवाळीत फाटके फोडण्यास बंदी घातली आहे. कारण थंडीच्या वातावरणात फटाक्याच्या प्रदुषणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने या राज्यांनी हा निर्णय घेतला आहे. याच पाश्र्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील आवाहन केले आहे की , राज्यातील जनतेनेही यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी.
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली की , ‘फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही मानसिकता आतापासून ठेवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांकडे आणि कॅबिनेटमध्येही मी याबाबत आग्रह धरणार आहे’. ‘फटाक्यांच्या धुरात टॉक्झिसिटी खूप असते.
थंडीमुळे तो धूर वर जाऊ शकणार नाही. त्यामुळे श्वसनाला अधिक बाधा निर्माण होऊ शकते. यासंदर्भात अधिक काळजी घेतलेली बरी आहे, यासाठीच दिवाळीपूर्वीपर्यंत हा नियम लागू करण्याचा माझा आग्रह राहील’. असं देखील त्यांनी सांगितले.


