भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील खंडाळा येथील एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली व मुलांनाही विष पाजल्याचा संशय असून त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचार सुरु आहे.
तालुक्यातील खंडाळा येथे अश्विनी किशोर चौधरी या परिवारासह राहतात. अश्विनी यांचे पती किशोर हे खासगी फायनान्स बँकेत नोकरीला होते परंतु लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्याने ते शेती करत होते. अश्विनीने बुधवारी सकाळी १०.१५ ला आत्महत्या केली तेव्हा श्रेयस (वय ९) आणि प्रणव (वय ३) हे मुलेही घरीच होते.
श्रेयस रडत बाहेर आल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दोन्ही मुलांना उलट्या झाल्याने त्यांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मुलांना कीटकनाशक दिल्याचे स्पष्ट झाले असून श्रेयसची प्रकृती गंभीर आहे. घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही.