नवी दिल्ली, वृत्तसंस्था : गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. देशात दररोज १४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेशात पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. याची दखल घेत गृहमंत्री अमित शहांनी आरोग्य मंत्रालयाला कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.
केंद्र सरकार आता ५० वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यासाठी पावलं टाकणार आहे. देशातील ५० वर्षांवरील व्यक्तींची संख्या २७ कोटींच्या घरात आहे. या व्यक्तींना लवकर लस मिळावी यासाठी केंद्र सरकार खासगी क्षेत्राची मदत घेणार आहे. ज्येष्ठांना कोरोनाचा अधिक धोका असल्यानं त्यांचं लसीकरण प्राधान्यानं पूर्ण केलं जाईल. खासगी क्षेत्राच्या मदतीमुळे कोरोना लसीकरणास गती येईल.
कोरोना लसीकरणात खासगी क्षेत्राची भूमिका नेमकी काय असेल, त्याची सविस्तर माहिती पुढील काही दिवसांत उपलब्ध होईल, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं तयार केलेल्या पथकाचे प्रमुख म्हणूनदेखील पॉल कार्यरत आहेत. सध्याच्या घडीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण सुरू आहे. त्यात खासगी क्षेत्राचा सहभाग आहे. दर १० हजार लसींच्या डोजपैकी २ हजार डोज खासगी कंपन्यांकडून दिले जात आहेत, असं पॉल यांनी सांगितलं.
लसीकरण अभियानाचा वेग वाढल्यावर त्यातील खासगी क्षेत्राचा सहभाग आणखी वाढेल. लसीकरण अभियानात खासगी क्षेत्राची मोठी भागिदारी गरजेची आहे. कारण त्यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्येपर्यंत लस पोहोचेल, अशी माहिती पॉल यांनी दिली. देशात सध्या आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन मेडिकल स्टाफलाच कोरोना लस दिली जात आहे.
४० ते ५० टक्के लसीकरण
एका उच्चपदस्थ सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील टप्प्यात दररोज ५० हजार लोकांचं लसीकरण करण्याची सरकारची योजना आहे. आतापर्यंत देशातल्या १.०७ कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोना लस देण्यात आली आहे. पुढील टप्प्यात ४० ते ५० टक्के लसीकरण खासगी क्षेत्राच्या माध्यमातून केलं जाईल. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केंद्रानं राज्यांना केल्या आहेत.


