नवी दिल्ली : भारतात आज 16 जानेवारी रोजी जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान (Coronavirus Vaccination) सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ प्रेस कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरण अभियानाची (vaccination Programme) सुरुवात केली. पंतप्रधान मोदींनी देशातील वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं असून जगातील सर्वात मोठा कोरोना वॅक्सिनेशन प्रोग्राम सुरू होत असल्याचं सांगितलं.
पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –
– आज वॅक्सिस रिसर्चशी जोडलेले अनेक लोक, वैज्ञानिकांचं विशेष कौतुक जे गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोनाविरोधात लस बनवण्यासाठी जुडले आहेत. साधारणपणे, एक वॅक्सिन बनवण्यासाठी अनेक वर्षांचा काळ जातो, मात्र आपल्या वैज्ञानिकांच्या प्रयत्नांनी एक नाही, तर दोन मेड इन इंडिया वॅक्सिन तयार झाल्या आहेत.
– संपूर्ण देश आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होता. कित्येक महिन्यांपासून देशातील प्रत्येक घरात लहान मुलं, वृद्ध, तरुण सर्वच जण कोरोना वॅक्सिन कधी येणार हाच प्रश्न विचारत आहेत. आता अतिशय कमी वेळात, लस आली आहे.
– आता काही वेळातच भारतात जगातील सर्वात मोठं लसीकरण अभियान सुरू होत आहे. याबाबत मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो.
– कोरोना वॅक्सिनचे 2 डोस घेणं महत्त्वाचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये जवळपास एक महिन्याचं अंतर ठेवणं आवश्यक आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी तुमच्या शरीरात कोरोनाविरोधात आवश्यक शक्ती विकसित होईल.
– इतिहासात, अशाप्रकारे आणि इतक्या मोठ्या स्तरावर लसीकरण अभियान यापूर्वी कधीही झालं नसल्याचं मोदींनी म्हटलंय. जगात 100 हून अधिक असे देश आहेत, ज्यांची लोकसंख्या 3 कोटींहून कमी आहे आणि भारत लसीकरणाच्या पहिल्याच टप्प्यात 3 कोटी लोकांचं लसीकरण करत आहे.
– दुसऱ्या टप्प्यात आपल्याला हे 30 कोटी संख्येपर्यंत पोहचवायचं आहे. वृद्ध, गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या लोकांना या टप्प्यात लस दिली जाईल. भारत,चीन आणि अमेरिका हे 30 कोटीहून अधिक लोकसंख्या असलेले केवळ तीन देश आहेत.
– तसंच, पहिल्या लशीनंतर मास्क न घालण्याची चूक करू नका. सोशल डिस्टंन्सिंग पाळ्याचं आवाहन मोदींनी केलं आहे. कारण दुसऱ्या लशीनंतर इम्युनिटी विकसित होत असल्याचं मोदींनी सांगितलं.


